प्रशंसा आणि वाद, दीड महिना चाललेल्या कुंभमेळ्याचा समारोप

सुमारे दीड महिना चाललेल्या कुंभमेळ्याचा समारोप बुधवारी महाशिवरात्रीच्या ‘शाही स्नान’ ने झाला. या मेळ्याची सुरुवात १३ जानेवारीला झाली होती. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे भरलेल्या या कुंभमेळ्याने वारंवार चर्चेत स्थान मिळवले. काही वेळा कौतुकाच्या रुपात, तर काही वेळा वादाच्या केंद्रस्थानी. या कुंभमध्ये अनेक विचित्र नाव असलेल्या संन्याशांचे दर्शन घडले. तसेच प्रशासनाच्या उत्तम व्यवस्थापनाचेही अनेक स्तरांवर कौतुक झाले.
मात्र, याच मेळ्यात काही दुर्घटनाही घडल्या. काही भाविकांना चेंगराचेंगरीला सामोरे जावे लागले, तसेच काही वेळा आग लागण्याच्या घटनाही घडल्या. यामुळे कुंभमधील सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तसेच संगमातील पाण्याच्या स्नानयोग्यतेबाबतही शंका उपस्थित करण्यात आल्या.
कुंभमेळ्याची तयारी आणि आयोजन
उत्तर प्रदेश सरकारने गेल्या वर्षीपासूनच कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी तयारी सुरू केली होती. प्रत्येक सहा वर्षांनी अर्धकुंभ आणि बारा वर्षांनी पूर्णकुंभ भरतो. यंदा प्रयागराजमध्ये पूर्णकुंभ होता. अधिकृत आकडेवारीनुसार, तब्बल ६३ कोटीहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर व्यवसायही झाला. कुंभ संपण्याच्या एक आठवडा आधीच व्यापारी महासंघाने जाहीर केले की, प्रयागराजमध्ये जवळपास ३ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे.
विचित्र नाव असलेले संन्यासी
या कुंभमेळ्यात अनेक अनोख्या नावाने ओळखले जाणारे संन्यासी दिसले. यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती अभय सिंग उर्फ ‘आयआयटी बाबा’ यांची. त्यांचा दावा होता की, त्यांनी आयआयटीमधून एरोस्पेस इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. समाजमाध्यमांवर त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अखेर जूना आखाड्याच्या तंबूतून त्यांनी कूच केली. काहींच्या मते, त्यांनी स्वतः तंबू सोडला, तर काहींच्या मते, त्यांना तंबूतून हाकलण्यात आले. याशिवाय ‘कबूतर वाले बाबा’, ‘मस्क्युलर बाबा’, ‘अँम्बॅसडर बाबा’ असे अनेक अनोख्या नावांचे संन्यासी यावेळी कुंभमेळ्यात दिसले.
कुंभमेळ्याचे व्यवस्थापन
उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने मिळून या कुंभमेळ्याच्या व्यापक प्रचारासाठी काम केले होते, त्यामुळे भाविकांची गर्दीही प्रचंड प्रमाणात वाढली. या प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. एआय-आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून ड्रोनच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. तसेच जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या. कोणत्याही अनुचित प्रकारांना रोखण्यासाठी बहुस्तरीय सुरक्षाव्यवस्था उभारण्यात आली. हरवलेल्या लोकांना शोधण्यासाठी एआय-आधारित प्रणालीचा वापर करण्यात आला. याच व्यवस्थेअंतर्गत ‘हरवले आणि सापडले केंद्र’ उभारण्यात आले, ज्याच्या मदतीने २०,००० पेक्षा अधिक भाविक त्यांच्या कुटुंबियांना शोधू शकले. रेल्वेनेही कुंभसाठी देशभरातून विशेष गाड्या चालवल्या.
राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींची उपस्थिती
या कुंभमेळ्यात अनेक राजकीय नेते, अभिनेते आणि उद्योगपतींनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही स्नान केले. तसेच योगी आदित्यनाथ, अमित शाह, जेपी नड्डा यांनीही कुंभस्नान केले. बॉलिवूडमधून हेमा मालिनी, अनुपम खेर, राजकुमार राव, कॅटरिना कैफ यांनीही उपस्थिती दर्शवली. ‘अॅपल’चे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल आणि ‘कोल्डप्ले’चे गायक ख्रिस मार्टिन यांनीही कुंभस्नान केले. मोदींनी स्नानानंतर सांगितले की, त्यांना ‘धन्य’ वाटले.
चेंगराचेंगरी, आगीच्या घटना आणि वादग्रस्त मुद्दे
प्रशासनाने सुरुवातीपासूनच व्यापक व्यवस्थापन केले होते, पण मौनी अमावस्येच्या स्नानादरम्यान प्रश्न निर्माण झाले. प्रशासन गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आणि चेंगराचेंगरीत किमान ३० जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, अनेक वेळा मोठ्या प्रमाणावर आग लागण्याच्या घटना घडल्या, ज्यामुळे तंबू भस्मसात झाले. या दुर्घटनांमुळे प्रशासनाच्या ‘आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गर्दी नियंत्रण व्यवस्थे’वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कुंभमधील व्यवस्थापनावर टीका केली. काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह अनेक विरोधी पक्षांनीही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. मात्र, भाजपने हा दावा फेटाळून लावला की, प्रशासनाने पुरेशी काळजी घेतली नव्हती. तृणमूल खासदार रचना बॅनर्जी यांनी कुंभस्नान केल्यानंतर सांगितले की, “ही एक अप्रतिम अनुभूती होती आणि व्यवस्थापनही उत्कृष्ट होते.” दुर्घटनांनंतर उत्तर प्रदेश सरकार अधिक सतर्क झाल्याचा दावा करण्यात आला.
त्रिवेणी संगमाच्या पाण्यावरून वाद
राष्ट्रीय पर्यावरण न्यायालयात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, कुंभमेळा सुरू होण्याआधी प्रयागराजच्या वेगवेगळ्या भागांतून पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात असे दिसून आले की, काही निकषांनुसार हे पाणी स्नानासाठी योग्य नाही. कुंभमेळा सुरू झाल्यानंतर भाविकांची गर्दी वाढल्याने जलप्रदूषणाचा धोका वाढल्याचेही अहवालात नमूद होते. या मुद्द्यावर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने सरकारवर टीका केली. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाचा दाखला देत सांगितले की, कुंभच्या पाण्याची गुणवत्ता स्नानासाठी योग्यच आहे.
डिजिटल स्नानाचा नवा ट्रेंड
यंदाच्या कुंभमेळ्यात ‘डिजिटल स्नान’ नावाची नवी संकल्पना चर्चेत राहिली. ज्या भाविकांना प्रत्यक्ष कुंभला जाता आले नाही, त्यांच्याकडून व्हॉट्सअॅपवरून फोटो मागवण्यात आले. त्यानंतर हे फोटो प्रिंट करून त्रिवेणी संगमात डुबवण्यात आले. यासाठी काही ठिकाणी भाविकांकडून ५०० ते १००० रुपये घेतले गेले. काही कुटुंबांनीही त्यांच्या एखाद्या सदस्याला कुंभमध्ये पाठवून त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या नावाने स्नान करवले.
या सर्व घटनांसह, प्रशंसेच्या तसेच विवादाच्या साक्षीदार राहिलेला हा कुंभमेळा अखेर संपला.